पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त ‘या’ शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!

एक रुपयात पिक विमा: राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका होत असतानाच आता सरकार आता पीक विमा योजनेत बदल करण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता असून पीक विमा योजना एक रुपयांत देण्याऐवजी 100 रुपयांत देण्याचा निर्णय होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयांतच पीक विमा ठेवण्याच्या निर्णय कायम करण्याची शक्यता आहे. पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आला आहे. 

तर पीक विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार 

दरम्यान, पीक विम्याच्या निकषात बदल न केल्यास 400 कोटी रुपये पिक विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकार पीक विम्याची रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात पीक विम्याचे 1.71 लाख शेतकरी आहेत. त्यापैकी 85 टक्के खातेदार शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे?

18 फेब्रुवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम फसल विमा योजना सुरू केली. ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. अतिवृष्टी, उच्च तापमान, आर्द्रता आणि दंव यांसारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प पैसे देऊन त्यांच्या पिकांचा विमा काढण्याची सुविधा मिळते.

अर्ज कुठे कराल? 

बँकेच्या शाखेतून अर्ज करण्यासाठी, तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकता. तुम्ही कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक 14447 वर देखील संपर्क साधू शकता. पीएम क्रॉप इन्शुरन्सच्या नोंदणीसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुकची फोटो कॉपी आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Leave a Comment